Copy Not Allowed

Wednesday 13 June 2018

जीवन अमूल्य आहे ...मस्तीत जगा



गेल्या महिना दोन महिन्यात झालेल्या आत्महत्यांच्या घटना मला विचार करायला लावत आहेत. पोलीस अधिकारी हिमांशू राय  यांनी आजारपणामुळे केलेली आत्महत्या , घरगुती ताण तणावातून केलेली आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांची आत्महत्या आणि  अहमदाबाद येथे दोन समलिंगी स्त्रियांनी समाजाच्या वागणुकीला कंटाळून केलेली आत्महत्या.

माणूस जीवनाला का कंटाळतो ? हा खरा प्रश्न . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केले म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता झाल्यावर स्वेच्छेने अन्नपाणी प्रश्न करणे सोडले . ही समजण्यासारखी गोष्ट आहे . पण अकाली मृत्याला कवटाळणे ? आजारपण , घरगुती वाद , प्रेम प्रकरण या मुळे जीव देण्याइतका जीव स्वस्त आहे का ?

माझ्या मते स्व-कर्तृत्वावर जरा जास्तीच विश्वास असणाऱ्या व्यक्तींना जेव्हा अनेक गोष्टी आपल्या हातात नाहीयेत किंवा आपल्या इच्छेप्रमाणे होऊ शकत नाहीत हे लक्षात येते तेव्हा आलेलं वैफल्य असा काही निर्णय घेण्यास भाग पाडते . जग आपल्या मताप्रमाणे नाही तर स्वतःच्या गतीने आणि मतीने चालत असते .  आपण या जगातले एक अतिशय छोटेसे अस्तित्व आहोत आणि त्यामुळेच जे समोर येईल ते स्वीकारणे, त्याला तोंड देणे भाग आहे .

अनेकदा अशी निराशाजनक स्थिती आपल्यासमोर उभी राहते . काय करावे याचा मार्ग दिसत नाही काही सुचत नाही . समलैंगिक म्हणून दुहेरी जीवन जगात असताना अशा निराशेच्या गर्तेत सापडलेले अनेक जण आढळतात .

उपाय काय ? 


बोला , व्यक्त व्हा , मनातल्या भावनांना मोकळी वाट करून द्या . आपले कुटुंबीय , आई वडील , मित्र हे सगळे आपला आधार आहेत . आपल्या अडीअडचणीला हेच लोक आपला आसरा बनतात . याना आपल्या सुख दुखत सामील करून घ्या . त्यांच्या सुख दुखत तुम्हीही सामील व्हा . कारण ही एकतर्फी प्रक्रिया नसते .

गप्पिष्ट असाल तर बोला , खेळाडू असाल तर भरपूर खेळा , चित्रकार असाल तर चित्र काढा , लेखक असाल तर लिहा ...ज्या प्रकारातून  तुम्हाला व्यक्त होता येते ते सर्व करा . 

समाज माध्यमांवर अनेक मित्र बनू शकतात. तुम्ही ज्या गोष्टी आपल्या सख्ख्या मित्राला किंवा आई वडिलांना सांगण्यास घाबरता त्या इथे मांडू शकता . इतरांच्या अनुभवातून शिकू शकता . फेक आय डी  चा उपयोग स्वतःला व्यक्त करण्यासाठी केलात तर  तणावापासून मुक्त तरी रहाल .

आत्महत्येने त्या व्यक्तीचा प्रश्न सुटला असे वाटत असले तरी  त्याच्या मागे राहणाऱ्या आई वडिलांचा, पत्नी, मुलाबाळांचा कुठलाच प्रश्न सुटत नाही . उलट त्यात वाढच होते . असे असेल तर आपण काय निर्णय घेतो आहोत याचा माणसाने विचार करावा .

नैराश्य हा एक आजार आहे आणि त्यावर वैद्यकीय  उपचार उपलब्ध आहेत . तुमचे मन सारखेच निराशावादी विचारांनी घेरलेले असेल तर सरळ मनोविकार तज्ज्ञांकडे  जाऊन उपचार सुरु करा . मनोविकार म्हणजे फक्त वेड लागणे नव्हे तर मनाशी संबंधित कुठलीही अडचण आपण या लोकांकडे मांडू शकतो . त्यांच्या ज्ञायचा उपयोग करून घेऊ शकतो...

मित्रांनी, जीवन ही  अतिशय सुंदर देणगी आहे . जीवनात अनेक चांगले लोक भेटतात जे तुमचे जीवन उजळून टाकतात , तुमच्या जीवनाला अर्थ देतात . त्या देणगीचा अपमान करू नका . मस्त जीवन जागा . तुम्ही गे आहात , गे या शब्दाचा अर्थ आहे आनंदी .... आनंदी रहा ..... मस्त जगा











No comments:

Post a Comment

Followers